केवळ तीन ओळींमध्ये आशय आणि भावना मांडण्याचा ‘हायकू’ हा काव्यप्रकार मराठीत रुजवणाऱ्या शिरीष पै, ‘दुनियादारी’ या जबरदस्त कादंबरीने अवघ्या तरुणाईला भुरळ पाडणारे सुहास शिरवळकर आणि समाजभूषण चरित्रकार पुरुषोत्तम पांडुरंग गोखले यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय... .....
शिरीष व्यंकटेश पै १५ नोव्हेंबर १९२९ रोजी जन्मलेल्या शिरीष पै कवयित्री, लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. आपले वडील आचार्य अत्रे यांच्याकडून साहित्याचा वारसा लाभल्याचं त्यांनी नवव्या वर्षीच लेखन सुरू करून सिद्ध केलं होतं.
वरकरणी दिसायला अत्यंत सोपा, पण केवळ तीन ओळींतून खोल आशय मांडू पाहण्याचा जपानी कवितेचा प्रकार ‘हायकू’ त्यांनीच सर्वप्रथम मराठीत आणला. जपानमध्ये जवळजवळ पाचशे वर्षांची परंपरा असणारा हा काव्यप्रकार जपानमध्ये १७व्या शतकात ‘बाशो’ या कवीने रुजवला होता. त्यातली खुमारी टिकवत शिरीष पै यांनी त्यांचे मराठीत अनुवादही केले आणि स्वतः स्वतंत्रपणे अनेक हायकू रचले. त्यांनी अनेक तरल, हळुवार प्रेमकविता रचल्या आहेत.
त्यांनी वडिलांच्या ‘मराठा’, ‘नवयुग’मध्ये पत्रकारिता केली होती आणि पुढे ‘मराठा’च्या संपादक म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यांना केशवसुत पारितोषिक, तसंच महाराष्ट्र राज्य सरकारचे आणि साहित्य परिषदेचे पुरस्कार मिळाले होते.
अंतर्यामी, अनुभवान्ती, अज्ञात रेषा, आईची गाणी, आकाशगंगा, आजचा दिवस, आठवणीतले अत्रे, आव्हान, ऋतुचक्र, एकतारी, कस्तुरी, काळी एकदा फुलली होती, कांचनबहार, चैत्रपालवी, जीवनगाथा, जुनून, माझे हायकू, फक्त हायकू, पुन्हा हायकू, रानातले दिवस, लालन बैरागीण, वडिलांच्या सेवेसी, हेही दिवस जातील, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
दोन सप्टेंबर २०१७ रोजी त्यांचं निधन झालं.
(शिरीष पै यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा. ‘वडिलांच्या सेवेसी’ या पुस्तकात शिरीष पै यांनी आई, वडील आणि पती यांच्याबद्दलच्या काही आठवणी लिहिल्या आहेत. त्या पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी मांडलेली आत्मचरित्राबद्दलची स्वतःची भूमिका वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) .................
सुहास शिरवळकर
१५ नोव्हेंबर १९४८ रोजी जन्मलेले सुहास शिरवळकर हे ‘सुशि’ या आपल्या नावाच्या आद्याक्षरांनी प्रसिद्ध असलेले तुफान लोकप्रिय कादंबरीकार आणि रहस्यकथाकार!
ऐंशीच्या दशकामधल्या युवा पिढीला त्यांच्या कादंबऱ्यांनी चांगलीच भुरळ घातली होती. त्यांनी तब्बल ९६ पुस्तकं लिहिली आणि काही कविताही लिहिल्या होत्या.
‘दुनियादारी’ ही त्यांची सर्वांत लोकप्रिय आणि गाजलेली कादंबरी. यावर टीव्ही सीरियल आली होती आणि
मराठी सिनेमाही आला होता.
अंतिम, अनुभव, असह्य, अवाढव्य, बलाढ्य, बंदिस्त, बरसात चांदण्यांची, भयानक, ब्लॅक कोब्रा, दास्तान, डेडशॉट, इलेव्हंथ अवर, गाफील, गिधाड, गोल्ड हेवन, गुणगुण, हव्यास, हिरवी नजर, कळप, काळे युग, कल्पांत सुशि, मर्डर हाउस, निदान, पहाडी, पहाटवारा, सहज, पोलादी, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
११ जुलै २००३ रोजी त्यांचं निधन झालं.
(सुहास शिरवळकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.) ...............
पुरुषोत्तम पांडुरंग गोखले
१५ नोव्हेंबर १८९९ रोजी जन्मलेले पुरुषोत्तम पांडुरंग तथा बाबुराव गोखले हे प्रसिद्ध चरित्रकार होते. त्यांना ‘समाजभूषण’या उपाधीने ओळखलं जाई. समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद यांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. १९४८ साली साताऱ्यामध्ये भरलेल्या पत्रकार परिषदेचे ते अध्यक्ष होते.
त्यांची एकूण ४२ पुस्तकं प्रसिद्ध झाली आणि गोपाळ गणेश आगरकर, वेदव्यास पंडित सातवळेकर, समर्थांचा संप्रदाय, भारतभाव, अशी काही पुस्तकं विशेष गाजली. १९८६ साली त्यांचं निधन झालं.
.............
(शिरीष पै यांच्या कारकिर्दीचा धावता आढावा घेणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)